Saturday, October 4

नव्या निवड समितीत सुरेन्द्र भावे : एका गुणवान खेळाडूला उशीरा मिळालेला न्याय


गेल्या दशकात देशांतर्गत क्रिकेट मध्ये धावांचा पाऊस पाडणऱ्या महाराष्ट्राच्या सुरेन्द्र भावेचा नुकत्याच जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या निवडसमितीत समावेश झाल्याने आनंद वाटला. जवळजवळ आठ हजार धावा व अठ्ठावीस शतके ठोकूनही त्या वेळच्या निवडसमितीने त्याच्यावर फारच अन्याय केला होता. दुय्यम दर्जाच्या सार्क कप स्पर्धेत १९९२-९३ मध्ये भारतातर्फे केवळ दोन सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. तेव्हा निवडसमितीने डावलले तरी आता त्यालाच ’सिलेक्टर’पद मिळाले हा नियतीचा वेगळाच न्याय!
भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या मराठी क्रिकेटपटूंची संख्या मोठी आहे. पण त्यातील बहुसंख्य मुंबईकडून खेळणारे. महाराष्ट्र राज्यातील इतर दोन संघातील (महाराष्ट्र व नागपूर) खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर क्वचितच मिळाली. केवळ चंदू बोर्डे यांना भारतीय संघाचे कर्णधारपद, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवडसमितीचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
अत्यंत प्रतिभावान असूनही दुर्लक्षित रहाण्याची वेळ अनेक महाराष्ट्रियन क्रिकटर्सवर आली आहे. ज्या काळात मध्यमगती गोलंदाजांची वानवा होती त्या काळात पांडुरंग साळगावकरला डावलण्यात आले. १९७५ च्या आसपास महाराष्ट्राचे हेमंत कानिटकरचेतन चौहान ऐन भरात होते. पण कनिटकरला केवळ दोन सामन्यांसाठी संधी मिळाली. तर चौहानची वर्णी लागली तो बेदीच्या दिल्ली संघात गेल्यावरच. सुरेन्द्र भावेसारखाच गेल्या पंचवीस वर्षात अनेक गुणी खेळाडूंवर अन्याय झाला. राजू भालेकर, शंतनू सुगवेकर, मिलिंद गुंजाळ, इक्बाल सिद्दिकी अभिजित काळे ही अशीच काही नावे. हृषिकेष कानिटकरला मात्र मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.
महाराष्ट्राच्या खेळाडूंची उपेक्षा बघून की काय, काही जणांनी दुसऱ्या संघांकडून खेळणे पसंत केले. जहीर खान (बडोदा) व संजय बांगर (रेल्वे) ही ठळक उदाहरणे. धीरज जाधवने तर वैतागाच्या भरात बंडखोरी करून आयसीएलचा रस्ता धरला. सुरेन्द्र भावेच्या निवडसमितीतील कारकीर्दीत महाराष्ट्राच्या प्रतिभेला न्याय मिळेल अशी आशा वाटते.

0 comments: